■ पोलिसांवर तलवारी उगारून वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या; आंदोलनाला हिंसक वळण
पालघर दर्पण : प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. जवळपास ६० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत असून अनेक बैठका देखील घेण्यात आल्या मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यातच आज २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड काढण्यात आली. मात्र या दरम्यान शेतकरी आक्रमक झाल्या असल्याचे दिसून आले.
दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले व आत घुसण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या व लाठी चार्ज केला. त्यावेळी संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या असल्याचे समोर आले. तसेच पोलिसांकडून अश्रुधुर चालवण्याच्या बंदुकाही हिसकावून घेण्यात आल्या असून पोलिसांच्या वाहनांच्या काचा देखील संतप्त आंदोलकांनी फोडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांच्या कडून दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड करण्यात येईल व ते अतिशय शांततेत पार पाडण्यात येईल असे सांगितले होते. मात्र तसे घडले नसून आता आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे.