पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर : तरुणाईतून नेतृत्व घडवण्याच्या ध्येयाने काम करणाऱ्या युवा सेनेत साईराज कल्पक पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या २९व्या वर्षी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला असून, पालघर व दहाणू विधानसभा क्षेत्रासाठी त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
साईराज पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात संघटन बांधणीवर विशेष भर देत गावा-गावात युवा सेनेचे जाळे मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेक ठिकाणी संघटना सक्रिय करत ग्रामीण भागात मजबूत संपर्क निर्माण केला आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात त्यांनी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रचार मोहीम, कार्यकर्त्यांचे नियोजन, मतदारांशी संवाद अशा विविध पातळ्यांवर जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी संघटन बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यपद्धतीतील सातत्य, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची क्षमता लक्षात घेऊनच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे.
युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी पाटील यांची पुनर्नियुक्ती जाहीर केली असून, आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना साईराज पाटील यांनी “युवा सेनेचे काम अधिक व्यापक करण्यासाठी, प्रत्येक गावात संघटन बळकट करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे पालघर-दहाणू परिसरात युवा सेनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

















