वाढवण बंदरात काम मिळविण्यासाठी गेलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष व आमदारांची दैनिय अवस्था.
वाढवण बंदर उभारणी करणाऱ्या कंपनी परिसरात कामगार व भाजप पदाधिकाऱ्यांन मध्ये धक्काबुक्की
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर उभारणीच्या कामावर भाजप जिल्हाध्यक्ष व बाहेरच्या तालुक्यातील आमदारांने खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वाढवण बंदर उभारणीचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या स्थानिक कामगारांनी हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत हाकलून दिल्याचे समोर आले आहे. यातच याप्रकरणी पालकमंत्री कडे तक्रार करताना पालकमंत्र्यांनी आमदारांना झापल्याने एकच चर्चेचा विषय बनला आहे.

वाढवण बंदर प्रकल्पाचे काम करणाऱ्या आयटीडीसी कंपनीच्या वाणगाव येथील कार्यालयात भाजप पदाधिकारी व स्थानिक कामगार आमनेसामने आले आणि या वादाचे रूप थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. आयटीडीसी कंपनीत सुरू असलेल्या कामांमध्ये काम मिळावे तसेच कंपनीत भाजपप्रणीत कामगार युनियन लावावी, या उद्देशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आमदार हरिश्चंद्र भोये व भाजप पदाधिकारी गेले होते. मात्र भाजप पदाधिकारी कंपनी कार्यालयात पोहोचताच तिथे काम करणाऱ्या स्थानिक कामगारांनी तीव्र आक्रमक पवित्रा घेतल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून आला.
“आम्ही स्थानिक कामगार आधीपासून येथे काम करत आहोत, बाहेरच्या नेत्यांनी इथे लुडबूड कशाला करायची?” असा थेट सवाल कामगारांनी उपस्थित केला. यावरून वातावरण तापले आणि दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्कीत झाले. संतप्त कामगारांनी एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांना जोरदार विरोध केला. परिस्थिती इतकी चिघळली की अखेर कामगारांनी भाजप जिल्हाध्यक्षांसह आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कंपनी परिसरातून बाहेरचा रस्ता दाखवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणामुळे वाढवण बंदर परिसरातील भूमिपुत्र विरूद्ध परकीय नेते असे वातावरण तापले असून पुढील काळात या वादाचे पडसाद अधिक तीव्र उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असून सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये कंपनीकडून स्थानिक मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार दिला जात आहे. आयटीडीसी कंपनीकडून ठेके घेतलेल्या कंपनीने सुरुवातीपासूनच स्थानिकांना कामावर घेतले असताना अचानक भाजप जिल्हाध्यक्षांनी एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह कंपनीत येण्याची गरज काय असा सवाल स्थानिकांन कडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक कामगारांच्या हक्कांवर डल्ला मारण्यासाठीच भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असून पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पस्थळी राजकीय हस्तक्षेप करून वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
◼️बंदरात ठेका मिळावा यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदारांचे प्रयत्न ?
भाजप जिल्हाध्यक्ष व आमदारांना स्थानिक कामगारांनी हाकलून लावल्यानंतर त्याबाबत तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली. आम्ही पक्षाच्या वतीने आयटीडी कंपनीच्या कामात गाड्याचे, कामांचे ठेके मिळावेत यासाठी गेल्याचे आमदार भोये यांनी सांगितल्या वर हा तुमचा मतदार संघ आहे का? अशी विचारणा करून राजेंद्र गावित यांच्या मतदारसंघावर तुम्ही अतिक्रमण करीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी आ.भोये यांना झापले. जिल्ह्यातील ज्या आमदारांच्या क्षेत्रात जो प्रकल्प असेल त्याला कमीत कमी विश्वासात घेऊनच पुढे जावे असा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड ही गौतम अदानीची कंपनी असून तुमच्या काय मागण्या असतील त्या तुम्ही माझ्याकडे लिखित स्वरूपात द्या, त्यानंतर कार्यकर्ते, स्थानिकांना रोजगार, छोटी छोटी कामे कशी मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू असे आमदारांना सांगितले.

◼️ स्थानिक कामगारांना बदनाम करणारा आमदार
स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही आयटीडी कंपनीच्या गेटवर गेलो असताना त्या कंपनीने गुंड पाळून ठेवले असून सर्व टाईट (दारू पिऊन) होते. आम्हाला पाहून फाटक बंद करून अंगावर मारायला धावले असे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्र्याकडे सांगत तक्रार केली. यावेळी डहाणू, पालघर तुमचा मतदार संघ आहे का? आ. राजेंद्र गावित यांच्या मतदारसंघात तुम्ही अतिक्रमण केले आहे असे खडे बोल पालकमंत्री गणेश नाईक यांनी आ.भोये यांना झापले आहे. महत्वाचे म्हणजे याठिकाणी कोणतीही कामगार दारूच्या नशेत नसताना कामगारांना बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत असे स्थानिक कामगारांनी सांगितले आहे.
◼️ बंदराच्या संदर्भात आंदोलना ठिकाणी विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर बेकायदा जमाव जमविल्याचा प्रकरणी गुन्हा दाखल किंवा नोटीस बजावणाऱ्या पोलिसांनी मात्र भाजप आमदारांसह जिल्हाध्यक्ष यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठा जमाव जमवला असताना त्यांच्याविरोधात मात्र कुठली ही कारवाई केली नसल्याने पोलिसी कायदा फक्त सर्वसामान्यांच्यासाठीच आहे का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. महत्वाचे म्हणजे घटनास्थळी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक स्वतः उपस्थित होते.
















