पहाड सिंगच्या कारखान्यातून रात्रीच्या वेळी घातक ऍसिड थेट शेतजमिनीत फेकले जात असल्याचे गंभीर आरोप
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा भीषण रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विराज प्रोफाईल कंपनीसाठी करण्यात येणाऱ्या एस.एस. कॉइल पिकलींगच्या नावाखाली हजारो लिटर विषारी रासायनिक सांडपाणी बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीकडून दररोज सुमारे २० ते २५ टन एस.एस. कॉइल पिकलींगसाठी बाहेर पाठवण्यात येतात. या कॉइल स्वच्छ करण्यासाठी दररोज सुमारे ५ हजार लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड (HCL) वापरले जाते. पिकलींग प्रक्रियेनंतर तयार होणारे ऍसिडयुक्त सांडपाणी अंदाजे ५० ते ६० हजार लिटर पाण्यात मिसळले जाते. मात्र या सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी ते थेट पर्यावरणात सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जे- ६६, १०४ व १०५ येथील “पहाड सिंग” यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या मे. धनलक्ष्मी स्टील अँड इंजीनियरिंग कंपनी या कारखान्यात हा बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कारखान्याकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (ETP) कोणतीही अधिकृत यंत्रणा नसतानाही, मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, वापरलेले घातक ऍसिड आणि रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता रात्रीच्या अंधारात उघड्या नाल्यांमध्ये, मोकळ्या जागांवर आणि थेट शेतजमिनीत फेकले जात असल्याचे वारंवार आढळून आले आहे. यासाठी स्थानिक युवकांचा वापर करून टँकरद्वारे सांडपाणी वाहून नेले जात असल्याचाही आरोप होत आहे.
विषारी पाण्यामुळे परिसरातील शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत असून भूजल मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेती व्यवसायावर होत असतानाही प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार राजकीय वरदहस्तामुळेच खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. विराज प्रोफाईल कंपनीकडून या बेकायदेशीर कामाला अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र संपूर्ण व्यवहाराबाबत कोणत्याही शासकीय विभागाकडे अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर येत आहे. किती जॉबवर्क झाले, किती ऍसिड वापरले गेले, किती सांडपाणी तयार झाले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली गेली, याबाबत कोणताही हिशेब ठेवला जात नसल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तारापूरसारख्या संवेदनशील औद्योगिक क्षेत्रात इतका मोठा पर्यावरणविरोधी प्रकार सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. संबंधित कारखान्याची सर्व कागदपत्रे, ऍसिड खरेदी-वापराचा हिशेब आणि सांडपाणी विल्हेवाटीची पद्धत यांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
















