- वाडा तालुक्यातील दुसरी घटना; केमिकल माफियांन कडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: वाडा-मनोर महामार्गावरील सापणे फाटा येथे केमिकल सोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा वाडा-मनोर महामार्गावरील आंभाई येथील घाटात एका शेतकऱ्याच्या शेतात टँकरमधील केमिकल सोडल्याची घटना घडली आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल माफियांनी हैदोस घातला असताना देखील जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे घातक रसायन आता रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर असलेल्या शेतात सोडुन दिले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
वाडा-मनोर रोडवरील ग्रुप ग्रामपंचायत आंभाई-आमगाव हद्दीतील कोहज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आंभाई घाटात भास्कर देऊ भोईर या शेतकऱ्याच्या शेतात देखील 2 जुलैच्या रात्री अज्ञात टँकर मधून हे केमिकल सोडले गेले आहे. याठिकाणी सोडण्यात आलेल्या घातक रसायनामुळे शेत जमीनीचे मोठे नुकसान झाले असुन या रासायनिक उग्र वासामुळे आजूबाजूची शेती देखील करणे या या शेतकऱ्याला त्रासदायक बनले आहे. तसेच जर मुसळधार पावसात पाण्याबरोबर हे केमिकल इतरत्र वाहत जाऊन आजूबाजूची शेतीदेखील नापीक होण्याचा धोका संभवत आहे. त्याच बरोबर हे केमिकल नाल्याद्वारे ओहळात आणि नदीत गेल्याने ते पाणी देखील दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्या भरा पासून तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन बेकायदेशीर पणे घातक रसायनाची वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा उघडकीस येवून सुध्दा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾ घातक केमिकलने एक शेत भरल्यानंतर दुसऱ्या शेतात देखील थोडे वाहत गेले होते. ती माती काढून टाकण्याकरिता या शेतकऱ्यांची घरचे लोक गेले असता त्यात केमिकलमुले त्यांच्या मुलीच्या पायाला जखम देखील झाली आहे. या केमिकलमुळे या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर असलेले एक मोठे झाड पूर्णपणे जळून गेले आहे.त्यामुळे हे केमिकल किती घातक आहे यावरून स्पष्ट होते.
◾ रात्रीच्या सुमारास अज्ञात टँकरमधून माझ्या शेतात केमिकल सोडले असल्याने माझ्या शेतीमधील एक शेत पूर्णपणे नापीक झाले आहे.तसेच या केमिकलचा उग्र वास येत असल्याने आजूबाजूची शेतीलागवड देखील करताना त्रास होणार होणार आज. तसेच जोरदार पाऊस झाल्यास हे केमिकल इतर शेतांमध्ये वाहत गेल्यास माझया दूसऱ्या शेतीचीदेखील नासाडी होणार असल्याने अशा केमिकल सोडणाऱ्या टँकरांवर तत्काळ कारवाई करून आम्हास नुकसान भरपाई द्यावी.
भास्कर देऊ भोईर
शेतकरी-आमगाव