पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्यात खरिप हंगामात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. एकेकाळी ‘वाडा कोलम’ च्या नावाने वाड्याचे नांव देशभरात पसरले होते. मात्र अलिकडेच शेतीमध्ये आलेल्या अनेक अडचणींमुळे उत्पादन घटले. मात्र येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून एसआरटी या पद्धतीने काही निवडक प्रयोगशिळ शेतकऱ्यांनी विविध आजारांवर उपयोगी ठरणा-या निळा व काळा या रंगाच्या वाणातील भाताची (तांदळाची) शेती करण्यास सुरुवात केली आहे.
सगुणा भात तंत्रज्ञानाचा अवलंब करून एस.आर.टी या नवीन भात लागवडी द्वारे येथील प्रयोगशील शेतकरी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या नविन पद्धतीमध्ये या वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील दोनशे शेतकरी सहभागी झाले आहेत. तालुक्यात अंदाजे 100-125 हेक्टर क्षेत्रावर एस.आर.टी.पद्धतीने भात पिकातील सुधारित औषधी वाणांची लागवड केली आहे. या वर्षी प्रयोगिक तत्वावर येथील निवडक शेतकऱ्यांना भात पीक प्रात्यक्षिकासाठी काळा भात, व निळा भात बियाणे वाडा तालुका कृषी विभागामार्फत मोफत देण्यात आले आहे.
काळा भात व निळा भात ही भात पिकाची दोन्ही वाणं मधुमेह, ताप, इत्यादी आजारांवर गुणकारी असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी येथील उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव, तालुका कृषी अधिकारी एल. के. राऊत, मंडळ कृषी अधिकारी आर. एस. जगताप, कृषी सहाय्यक एस. एल. पाटील इत्यादी कृषी कर्मचा-यांचे प्रयत्न सुरु आहेत.