◾ हेमेंद्र पाटील
पालघर जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या पालघर दर्पणचा एक वर्षाचा प्रवास पुर्ण झाला असून पालघर दर्पण 2 मार्च 2021 रोजी नव्या वर्षांत पदार्पण करत आहे. करोना काळ सर्वांन साठी खडतर गेला असला तरी वाचकांना योग्य वृत्त देण्याचे काम पालघर दर्पण टिमने केले आहे. 2 मार्च 2020 रोजी पालघर दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पहिल्या आठवड्यातच वाचकांनी भरभरून प्रतिसाद देत पालघर दर्पणच्या बातम्यांना पसंती दिली. अचूक व खात्रीशीर वृत्त प्रसिद्ध होत असल्याने पालघर दर्पण मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी म्हणजे एक पुरावाच आहे अशी पोचपावती देखील मिळत गेली.
वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्याच दरम्यान देशावर आलेल्या करोना संकटामुळे 26 मार्च 2020 रोजी देशभरात टाळेबंदी लागु झाली. यावेळी चार आठवड्याचे चार अंक प्रसिद्ध झाले होते. अचानक टाळेबंदी लागल्याने पुढे पेपर चालवायचा कसा हा मोठा प्रश्न समोर उपस्थित राहिला. मात्र समोर डोंगरा एवढ्या उभ्या राहिलेल्या समस्यांवर मात करत पेपर सुरूच ठेवत वाचकांना अचूक बातम्या व करोना काळातील परिस्थिती यावर योग्य माहिती देता आली. करोना काळात पत्रकारिता करताना पत्रकारांना देखील अनेक आवाहने उभी राहत होती. आपला जीव धोक्यात टाकून फक्त वाचकांना योग्य वृत्त द्यावे यासाठी धडपड चाललेली पाहावयास मिळत होती.
पालघर जिल्हा तर करोना काळात देशभर गाजला याच वेळी गडचिंचले साधु हत्याकांड घडले. देशभर गडचिंचले साधु हत्याकांड प्रकरण साधारण महिनाभर सुरू होते. हत्याकांड प्रकरणात वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करत यावेळी देखील रोकठोक पणे योग्य बातम्या पालघर दर्पण मधून प्रसिद्ध झाल्या. करोना काळात पालघर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर व काँरन्टाईन सेंटरची दुरावस्था पाहावयास मिळाली. मात्र आरोग्य विभाग शासकीय गैरसोई कडे दुर्लक्ष करत आपले कर्तव्य बजावत होते. करोनाने सर्व दाखवून देत आर्थिक परिस्थिती देखील सर्वांची कमकुवत केली. मोठ मोठी वृत्तपत्रे अनेक महिने बंद ठेवण्यात आली. काहींनी तर फक्त पिडीएफ पेपर सुरू करत आले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण ही मंडळी अधिच पेपर ची पिडीएफ सोशलमिडीयावर प्रसारित करत नव्हते. कारण सोशलमिडीयावर पेपर टाकणे अशा मोठ्या लोकांना कमी पणाचे याअगोदर वाटत होते. मात्र करोना काळात सर्वांना सोशलमिडीयाचा कसा वापर करावा लागला हे दिसून आले.
पालघर दर्पणने करोना काळात एक दिवस देखील वृत्तपत्र छपाई मध्ये खंड पडू दिला नाही. अगदी वेळेवर वाचकांना वृत्तपत्र मिळावे यासाठी वितरण विभाग मेहनत करताना दिसत होता. वृत्तपत्रात नागरी समस्या, रस्ते, अनधिकृत बांधकाम, तारापूर मधील रासायनिक प्रदूषण, बेकायदेशीर खदानी अशा एक ना अनेक प्रश्नांवर रोकठोक पणे लिखाण करून वाचकांन पुढे विषय आणले. शासकीय यंत्रणा देखील अनेक प्रसिद्ध झालेल्या बातम्या वरून काही भागात कारवाई व त्यांची दखल देखील घेतली.
नागरिकांना वेळोवेळी योग्य बातम्या देण्याचे काम पालघर दर्पण टिमने केले. राजकीय, सामाजिक व अनधिकृत कामे यावर रोकठोक पणे आपली भुमिका मांडून प्रवाहाच्या विरूद्ध राहुन आपले वेगळे स्थान निर्माण करत अल्पावधीतच पालघर दर्पण लोकप्रिय झाला. अनेक विषयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज वर्ष उलटून नवीन वर्षांत पदार्पण करत असताना आजवर 52 अंक कोणताही खंड न पडता प्रसिद्ध झाले याचा अभिमान वाटतो. यापुढेही अशाच ताकदीने पालघर दर्पण आपल्या समोर येत राहिल. वाचक, जाहिरातदार, वितरण विभाग व हितचिंतकांचे विशेष आभार त्याच्या मुळे हा टाळेबंदी मधला खडतर प्रवास सहजपणे पार करता आला. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल खुप खुप धन्यवाद.