◾देशातील सर्वात प्रदूषणकारी भाग ठरलेल्या तारापूरचा प्रवास विनाशाकडे
◾हेमेंद्र पाटील
कोकण किनारपट्टी भागात पालघर जिल्ह्या येत असून वसई ते झाई पर्यंत निसर्गरम्य समुद्र किनारी पर्यटकांना खुनावत असतो. मात्र आता येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणाचा फटका येथील स्वच्छ समुद्र किनाऱ्यांना बसत असून रासायनिक सांडपाणी बेकायदेशीर पणे नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याने समुद्र किनारीवर रासायनिक रंगीत पाण्याचे लाटा अनेकदा दिसून येतात. उद्योग धंदे सुरू राहिले पाहिजे ही भुमिका जर राज्य सरकार घेत असेल तर पर्यावरणाचा समतोल देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. याचा विसर राज्यकर्त्यांना पडलेला दिसून येतो. सुंदर पर्यावरण व स्वच्छ समुद्र लाभलेल्या तारापूर भागाचे विदृपीकरण झालेले पाहावयास मिळत असून तारापूरच्या भूगर्भात तर आता रासायनिक पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. कुपनलिकेला मोटर सुरू झाल्यावर रंगीत पाणी याभाग येत असून संपूर्ण भागातील भूगर्भातील पाण्याचा साठा प्रदूषित झाल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणी मध्ये याअगोदर उघड झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रा लगत येणाऱ्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत धोकादायक असून हे पाणी वापरात घेऊ नये असा आदेश पालघर जिल्हा परिषदेने मागील महिन्यात काढला होता. यानंतर ज्याठिकाणी पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत अशा ठिकाणी पाणी वापरासाठी अयोग्य असे फलक देखील लावण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेने केलेली तपासणी ही औद्योगिक क्षेत्र लगत असलेल्या गावांची होती यामध्ये तालुक्यातील इतर गावांची तपासणी करण्यात आली नसल्याने दुषित झालेल्या पाण्याचे गुपित पुर्णपणे उलघडू शकले नाही. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत व त्याला जोडणारे झरे यामुळे औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी दुरवर असलेल्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने आता तरी मानवी जिवावर उठलेल्या येथील प्रदूषणावर लगाम लावण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा वाढलेला स्थर व त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले दुर्लक्ष यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक दूषित पाण्याचा वापर करत होते. मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे घटक पिण्याच्या पाण्यात असल्याने याभागात गंभीर आजाराचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
रासायनिक घटक असलेल्या अतिशय दूषित पाण्याचा वापर याभागात होत असल्याने याभागात त्वचारोग, किडनी विकार, अस्तमा व कँन्सर अशा महाभयंकर आजरा पासुन ग्रस्त रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषद पालघर यांनी केलेल्या सर्वे मध्ये साधारण 14 हजार नागरिकांना विविध आजाराची प्रदूषणामुळे बाधा झाल्याचे समोर आले होते. नैसर्गिक साधनसंपत्ती पुर्ण पणे नष्ट झालेल्या तारापूर मध्ये आता भूगर्भातील पाण्याचा साठा देखील पुर्णपणे दुषीत झाल्याने त्याचा विपरित परिणाम मानवी जिवनावर होऊ लागला आहे. पालघर जिल्हा परिषदेने डहाणु येथील प्रयोगशाळेच्या मार्फत तारापूर औद्योगिक क्षेत्रा लगत असलेल्या गावातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत तपासणी केली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर व परिसरात असलेल्या 13 ग्रामपंचायती अंतर्गत 16 गावांमधील 86 सार्वजनिक व 535 खाजगी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने उपविभागीय प्रयोगशाळा, डहाणू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यांपैकी 5 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व 61 खाजगी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिकदृष्ट्या दुषित असल्याचे तपासणी मध्ये उघड झाले होते.
राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणाकडे लक्ष देत प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले होते. यानुसार काही कारखान्यांवर कारवाई करून त्यानंतर बँकेच्या हमीपत्रांवर पुन्हा कारखाने सुरू करण्याचा प्रकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण येथील प्रदूषणकारी कारखान्यांन वरून सुटल्याने उद्योजकांच्या आर्थिक दबावामुळे बड्या उद्योजकांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. पर्यावरण विभागाचे मंत्री देखील काळवंडलेल्या तारापूर कडे लक्ष देण्यासाठी तयार नसल्याने हा भाग अतिशय प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालला आहे. रासायनिक कारखान्यातुन घातक रसायने नैसर्गिक नाल्यात सोडताना अनेक कारखाने सापडले असतानादेखील मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या उद्योजकांवर एकही फौजदारी कारवाई तारापूर मध्ये करण्यात आलेली नाही. याच मुळे रासायनिक सांडपाणी खुलेआम सोडण्याचे प्रकार याठिकाणी होत असून त्यावर कोणत्याही विभागाचा लगाम नाही. यातच सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात कोणत्याही प्रकारची सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसून हे रासायनिक सांडपाणी समुद्रात अवघ्या 500 मिटर अंतरावर सोडले जात असल्याने येथील सुंदर समुद्रांचे विदृपीकरण झाले आहे. यामुळे देशातील सर्वात प्रदूषणकारी भाग ठरलेल्या तारापूरचा विनाशाकडे जाणाऱ्या प्रवासाला शासनाने वेळीच आवर घालणे येणाऱ्या पिढीसाठी गरजेचे आहे.