पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: स्थानिक नागरिकांच्या तसेच सेवाभावी संस्थांच्या मदतीने माफक खर्चात संपूर्ण गावाचा विकास साधणे शक्य असल्याचे उदाहरण मोखाडा येथील भेंडीपाडा या गावाने करून दाखवला आहे. २६-२७ लाख रुपयांच्या खर्चामध्ये गावामध्ये उपसा सिंचन पद्धतीने दीड किलोमीटर लांबीवरून पाणी गावात उपलब्ध झाल्याने गावाच्या अर्थकारण बदलले आहे.
लायन्स क्लब ऑफ तारापूर, तारापूर येथील सुमिटोमो केमिकल्स व दिगंत स्वराज फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी 300 लोकवस्ती असलेल्या गावाचा कायापालट करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पांतर्गत भेंडीपाडा गावापासून सुमारे दीड किलोमीटर लांब वाहणाऱ्या वाघ नदीच्या पात्रातून उपसा सिंचन पद्धतीने (लिफ्ट इरिगेशन)पाणी सौर पंपाच्या मदतीने आणले आहे. गावामध्ये दहा-बारा हजार लिटर क्षमतेचे पाच जलकुंभ, तीन टाक्या बसवण्यात आले असून त्यामुळे विखुरलेल्या गावाच्या भागात घराजवळ पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी लागणारा तीन- साडेतीन तासांचा अवधी काही मिनिटावारे आला आहे.
गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून विशेष जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्याच बरोबरीने गावात दोन नवे शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त बनण्यासाठी प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी एका वर्गाची दुरुस्ती करण्यात आली तसेच सर्व खोल्यांमध्ये सौर दिवे- पंखे बसवण्यात आले आहेत. या शिवाय गावात आठ पथदिवे बसवून गावाचा एकात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय गावात असलेल्या दहा एकर जमीन सिंचनासाठी आणून या ठिकाणी भाजीपाला, फळ लागवड तसेच मोगरा लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या एकात ग्रामविकास प्रकल्पामुळे भेंडीपाडा गावातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यात येईल असे या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यानां वाटत आहे.
या विविध योजनांचे लोकार्पण लायन्स क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनिल भुसारा, पंचायत समिती सभापती सारिका निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होते. आगामी काळात अशाच प्रकारे इतर काही गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल असे लायन्स क्लब च्या पदाधिकारी यांनी सांगितले.