◾ वैशाली आहेर
नवराञ म्हणजे स्ञी शक्तीची उपासना, नवराञ म्हणजे स्ञीमधे असलेल्या अदभुद अश्या शक्तीचा जागर. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र महोत्सव भारतभर आनंदात आणि उल्हासात साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृती नुसार वर्षभर महिलांसाठी विविध सणवार आहेत. आजही समाजातील स्त्रियांचा दर्जा पूर्वीपेक्षा सुधारलेला असला तरी एकीकडे मात्र महिलांना अजूनही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग ते घर असो ऑफिस असो अथवा समाज असो.
वेदकाळात मैत्रेयी गार्गी यांच्यासारख्या विदुषी होत्या तेव्हादेखील स्त्रियांच्या विद्वत्तेची दखल घेतली जात होती. त्यांनाही राज्यकारभार करण्याचा अधिकार होता रामायणातील सीता तर त्यागाच प्रतीक आहे पण सहनशीलता तिलाही चुकली नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. मग महिलांची प्रतिमा आजही त्यागमुर्तीच आहे का ? मुलांची माय,पतीची सहचारिणी, पित्याची कन्या भावाची बहीण अशा एक ना अनेक रूपात ती आपली भूमिका बजावत असते. अनेक पुरुष स्त्रियांच्या कर्तुत्वाला सलाम करत ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहतात ही भाग्याची गोष्ट आहे.
स्त्रियांसमोर महत्त्वाचे आव्हान म्हणजे समाजात होणाारे लैंगिक शोषण याबद्दल तिने स्वतः आवाज उठवणे गरजेचे आहे. आजच्या पिढीतील महिलांनी मुलींनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध होणे गरजेचे आहे. कायद्याचा योग्य वापर करून त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे वाक्य लक्षात ठेवून महिलांनी समर्थ बनल पाहिजे तरच स्त्रि शक्तीचं स्मरण पूजन आणि जतन आपल्याकडून होईल. ‘न स्त्रि स्वातंत्र्यम् अर्हती ‘ असे सांगणारा काळ स्ञीयांमधील चैतन्याला, तिच्या आत्मसन्मानाला आव्हान देत होता आणि देत राहील. महिलांना आपल्या हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. स्ञीयांचा विकास व्हायचा असेल तर स्ञी शक्तीचा जागर ही संकल्पना समजून घेतली पाहिजे आणि ती अभ्यासली देखील पाहिजे.
आपल्या देशातील फार कमी अश्या समाज सुधारकांना स्ञी शक्तीचा जागर समजला. आणि त्यांनी स्ञीयांसाठी अतिव कामगीरी केली. आणि त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या मार्गाने जाण्याचे धाडस काही मोजकीच मंडळी करीत आहेत. आजही आपल्या प्रगत समाजातील बहुतांशी लोक मनुवाद विचारसरणीला प्राधान्य देणारी आहेत. आणि बाहुतांशी स्ञीयांना सुद्ध स्ञी शक्तीचा जागर कळला आहे का? ही तपासण्याची गोष्ट आहे. कारण त्यांची वर्तणूक अगदी दुहेरी असते. बोलणं आणि वागणं यामधे खुप तफावत असते. सर्व रुढी परंपरा हे सुद्धा आपल्या सोयीनुसार पाळतात आणि टाळतात. हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.
शहरातल्या चार बायका स्कुटी वरुन फिरु लागल्या त्यामुळे लोकांना वाटते कि, कुठे आहेत महिलांना बंधनं? त्या आता सशक्त झाल्या पण तसे नाही. चार सुशिक्षित बायकांकडे पाहून आपण समस्त महिलांबद्दल अंदाज बांधू शकत नाही. आता महिला सक्षम झाल्या आहेत असं म्हणू शकत नाही. स्ञी मुक्ती चळवळ अजूनही सर्व स्तरातील लोकां पर्यंत पोहचलेली नाही. आजही ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमधे महिलांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. शहरात सुद्धा सुशिक्षित महिलांना आजही घरगुती आत्याचाराला सामोरे जावं लागतं.
स्ञी शक्तीचा जागर करायचा असेल तर सर्वात आधी तिला पुजणं बंद केलं पाहिजे. तिचं मनोबल, आत्मबल वाढवलं पाहिजे. तिला स्वतःबद्दलच्या कायद्याची, अधिकाराची माहिती करुन दिला पाहिजे. रोजचं दैनंदिन जीवन जगणं सुखकर होण्यासाठी तिला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत आणि तिचा सर्वांगीण विकास होऊन ती कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तरच ख-या अर्थाने स्ञी शक्तीचा जागर होईल असे मला वाटते.