■ या आधी १०५ जणांचा जामीन मंजूर त्यात आज आणखीन ८९ जणांचा जामीन मंजूर झाला आहे.
पालघर दर्पण : प्रतिनीधी
गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी आज ८९ जणांना जामीन मिळाला आहे. या अगोदर देखील १०५ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. आजची सुनावणी ठाणे येथील न्यायालयात झाली असून विशेष न्यायाधीश एस. बी. बहालकर यांनी ८९ जणांना जामीन मंजूर केला.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणात जवळपास २५१ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील १०५ जणांची आधीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर आज शनिवारी १६ जानेवारी रोजी या प्रकरणाबाबत सुनावणी झाली असून आणखीन ८९ जणांचा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात ऐकूण १९४ आरोपींचा जामीन मंजूर झाला आहे.
गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.