प्रदुषणकारी मस्तावलेल्या उद्योजकांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे मोकळीक; तारापुर बरोबरच महाराष्ट्रांचे प्रदुषणाबाबतीत देशात नावलौकिक
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: प्रदुषणाच्या बाबतीत देशात नावलौकिक झाल्यानंतर तारापुरच्या प्रदुषणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. सर्वाधिक प्रदुषणाचा स्थर तारापुर मध्ये वाढल्याने येथील प्रदुषणकारी कारखान्यांवर निर्बंध लावण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली नाही. दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या प्रदूषणामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने तारापुर कडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने तारापुरचे प्रदुषण सुरूच राहिले आहे.
तारापुर मधील प्रदुषणाला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या दुर्लक्षामुळे येथील प्रदुषणाचा स्थर वाढलेला आहे. यातच तारापुर मधील काही अति प्रदुषण करणारे उद्योजक येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आर्थिक वजन ठेवत आल्याने तारापुर देशातील सर्वाधिक प्रदुषणाचा भाग झाला आहे. गेल्या वर्षी तारापुर हे देशातील प्रदुषणकारी भाग असल्याचे जाहीर झाल्यानंतर एकाही यावेळीच्या पर्यावरण मंत्र्यांनी तारापुरची पाहणी देखील केली नव्हती. सुदैवाने यावेळी देखील पर्यावरण मंत्री पद शिवसेनेच्या युवराजांकडे असल्याने ते आता येथील प्रदुषणाकडे लक्ष देतील या भाबड्या आशेने असलेल्या तारापुर वासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे राज्यात सत्तेवर असलेली शिवसेना यावेळी तरी तारापुरच्या प्रदुषणाकडे लक्ष देईल का हे पाहणेच सोईचे ठरेल.
तारापुर औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून कारखाने बंद सुरू करण्याचा खेळ सुरूच आहे. एखाद्या कारखान्याला प्रदूषण केले म्हणून कारखाना बंद करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतर कारखान्याचे 72 तासाच्या नंतर विज व पाणी बंद करून कारखाना बंद केला जातो. मात्र याच वेळेत कारखानदार कायद्याची पळवाट शोधून बँकेची हमी देऊन एक-दोन दिवसातच आपले कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडून घेऊन येतात. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही नोटीसा बजावण्याचा कांगावा केला असला तरी तारापुर मधील प्रदुषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढलेलाच दिसतो. यातच अटीशर्तीवर कारखाने तात्पुरते सुरू करण्यासाठी जरी परवानगी दिली जात असली तर ज्या कारणांमुळे कारखाने बंद केले त्याबाबत उपाययोजना केली नसताना देखील कारखाने सुरू केले जात असल्याने उपाययोजना होईपर्यंत प्रदुषण सुरूच राहते.यामुळे प्रदुषणकारी घातक कारखान्यांवर ठोस कारवाई करण्याकडे पर्यावरण विभाग मोठमोठ्या उद्योजकांन कडे पाहुन प्रदुषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
⚫ तारापुर औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर पणे विषारी वायु हवेत सोडणे, सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यात सोडणे व क्षमतेपेक्षा लहान असलेले सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्र यामुळे तारापुर भागातील नैसर्गिक नाले, खाडी, शेतजमीन व समुद्र संपूर्ण पणे प्रदुषित झाला आहे. यातच अस्वच्छ सांडपाणी वाहिन्या यामुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचे रोजच दिसुन येते.