◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रदूषणकारी कारखानदारांंना मोकळे रान
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांन कडून घातक रसायन नाल्यात सोडल्या प्रकरणी आठवडा उलटून जात असतानादेखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यामुळे घातक रसायन सोडणारा कारखानदार मोकाट असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. यातच एका बड्या उद्योजकांचा हा कारखाना असल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई साठी दबाव असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील प्लाँट नंबर एस 47 या रासायनिक कारखान्यातुन घातक रसायन चोरट्या पध्दतीने नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्या नंतर सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्वतः या कारखान्यांची तपासणी केली होती. मात्र याच वेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कारखानदारांच्या हस्तगता मार्फत प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना दुरध्वनी लावुन दिल्यानंतर राजपूत माघारी परतले होते. यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नसुन कारखान्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. परंतु आठवडा उलटून जात असताना देखील प्रदूषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. महत्त्वाचे म्हणजे इतर एखाद्या कारखान्यांवर कारवाई करताना वेळेचा देखील विलंब न करता तातडीने कारखाना बंद ची कारवाई केली जात असली तरी या प्रदूषणकारी कारखान्याला मोकळीक का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
तारापूर मधील आरती ड्रग्स कारखान्यातील रसायन हे एस 47 या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करण्याच्या नावाखाली आणले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा चोरटा प्रकार सुरू होता. कारखान्यातुन निघणारे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रूपयाचा खर्च वर्षाकाठी येत असल्याने कारखानदारांने एस 47 याठिकाणी एक कारखाना घेवून त्याठिकाणी हे घातक रसायन थेट नाल्यात सोडले जात होते. महत्त्वाचे हे रसायन आरती ड्रग्स या कारखान्यांचे असल्याचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी घटनास्थळी असताना सांगितले होते. मात्र वरिष्ठ स्थरावरून एका राज्यमंत्री दर्जाच्या मंत्र्यांने फोन करून दबाव आणल्याचा प्रकार घडला असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत खातरजमा करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांना खाजगीत जाऊन विचारणा केली असता त्यांनी दबक्या आवाजात बोलत वरिष्ठ स्थरावरून दबाव असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. यामुळे आता अशा प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई नक्की केव्हा होणार याबाबत साशंकता आहे.
◾एस झोन मध्ये नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाणी प्रकरणी एक अहवाल आल्या नंतर एस 47 या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. तसेच ज्याठिकाणाहुन हे रसायन येत होते याबाबत देखील कारवाई बाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाईल.
— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर