रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम
◾ चित्रालय भागात रस्त्यावर उडणाऱ्या धुळी मुळे नागरीक त्रस्त; दोन वर्षापासून रस्त्यांचे बांधकाम प्रतिक्षेत
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या चित्रालय रस्त्यांच्या बांधकामासाठी अनेकदा आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र चित्रालय भागात गेल्या दोन वर्षापासून नागरिक रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त असताना देखील रस्त्याच्या बांधकामाकडे संबंधित ठेकेदार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदाचे वर्ष देखील अशीच धुळवड खात नागरीकांना प्रवास करावा लागत आहे.
बोईसर तारापुर मुख्य रस्त्यांचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असुन यातील काही काम टाळेबंदीत घाईघाईने सुरू करण्यात आले होते. मात्र चित्रालय येथील रस्त्याच्या कामाकडे गुजरात येथील ठेकेदारांने दुर्लक्ष केल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या महिनाभर अगोदर याठिकाणी पडलेल्या खड्ड्यावर डांबराचा मुलामा चडविण्यात आला होता. परंतु पावसाळा सुरू होताच संपूर्ण डांबर निघून गेल्यावर त्याठिकाणी पुन्हा मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात खड्ड्यात टाकलेली दगड पावडर हवेने सर्वत्र उडत असल्याने नागरिकांना येथून चालणे जिकरीचे झाले आहे. सतत उडत राहणाऱ्या धुळीकणामुळे नागरीकांना श्वासनाचे आजार होण्याची शक्यता आहे. याठिकाणी असलेल्या फळभाज्यांवर व खाद्यपदार्थावर देखील धुळीकणाचा थर पाहावयास मिळत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
◾ चित्रालय येथील रस्त्यावर पावसाळ्यात दरवर्षी चित्रालय भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसुन येतात. नागरीकांची खड्डे बाबत ओरड झाल्यानंतर व वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून दगड पावडर रस्त्यावर टाकली जाते. मात्र पावसाळ्या नंतर सुकलेली दगडी पावडर येणाऱ्या जाणाऱ्या वाहणा मुळे हवेत उडत असल्याने नागरीकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठमोठ्या वाहनांच्या मागे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अक्षरशः समोरचा रस्ता देखील दिसत नसून संपूर्ण धुळ डोळ्यात जात आहे.
◾चित्रालय रस्त्यांचे काम सुरू केले जाईल अशी आश्वासने सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा दिली आहेत. मात्र आजुही सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या कामाचा मुहूर्ताच्या मिळत नसल्याचे दिसून येते. यातच चित्रालय भागात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असुन फळभाज्या विक्रेते व मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे उघड्यावर दुकाने आहेत. दिवसभर उडत असलेल्या धुळी मुळे संपूर्ण धुळवड खाद्यपदार्थांवर व फळभाज्यांवर उडत असल्याने धुळीचा थर साचला जात आहे. यामुळे उघड्यावर असलेले खाद्यपदार्थ व फळभाज्या खाणे देखील नागरीकांच्या आरोग्यासाठी धोकादायक झाले आहे. यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची कामे पुर्ण करण्याची मागणी नागरीकांन कडुन होत आहे.