◼ विवा महाविद्यालयातील बीएमएमच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम; मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापराचे महत्त्व आदिवासी महिलांना दिले पटवून
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण देणे आवश्यक नसून त्यांना सामाजिक जबाबदारी आणि त्यासंबंधीत उपक्रमांची माहिती देणे आवश्यक असते. याच गोष्टींचा विचार करून विरार येथील विवा महाविद्यालयातील बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी वाणगाव येथील वनई गावातील तांबुडपाडा आणि माछीपाडा येथील आदीवासी वस्तीमध्ये जावून सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली आहे.
ग्रामीण भागात आजही मासिक पाळी दरम्यान कपड्याचा वापर केला जातो. आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आदिवासी भागात याबाबत जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थांनी पुढाकार घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरणे काळाजी गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून महिलांना पटवून दिले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मराठी पत्रकारिता आणि जाहिरात माध्यमातील विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. ‘या रे या सारे या, जनजागृती करुया, एकमेकांना सांगुया, सॅनिटरी पॅड वापरूया’ अशा घोषणा करत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन पाड्यातील महिलांना एकत्र आणले होते.
पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महिलापर्यंत चांगला संदेश पोहचवत मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरणे गरजेचे असल्याचे महिलांना पटवून देण्यात आले. तर कपडा वापरल्याने होणार त्रास तसेच आरोग्याच्या दृष्टीने असलेले धोके देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना समजावून देत महिलांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी तांबुडपाड्यातील अंगणवाडी शिक्षिकांनी देखील पाड्यातील महिलांना एकत्र आणण्यास सहकार्य केले असुन विद्यार्थ्यांसोबत बीएमएमच्या शिक्षिका रुकसार शेख यांनी उपस्थित राहुन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमाला महाविद्यालयाचे व्यवस्थापक, प्राचार्य ए. पी. पांडये, उपप्रचार्या प्राजक्ता परांजपे, बीएमएमच्या विभाग प्रमुख नीतू शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी बीएममच्या तिसऱ्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.