◾अक्करपट्टी गावात चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण करून लाखोचा निधी वाया; सार्वजनिक बांधकाम विभागाला धुडकावून ठेकेदाराने केले बेकायदेशीर काम
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील अक्करपट्टी या पुर्नवसन झालेल्या गावात लाखोचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाया घालवाला आहे. गावातील खराब झालेल्या रस्त्यासाठी मंजूर असलेला निधी एखाद्याच्या सांगण्यावरून आवश्यकता नसलेल्या ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे गावातील खरोखरच गरज असलेल्या ठिकाणी दुर्लक्ष करत खड्डेमय रस्ते तसेच राहिले आहेत. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराच्या अभियंत्याने मनमर्जी पणे काम केल्याचे उघड झाले असून बेकायदेशीर केलेल्या कामाला विरोध करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अक्करपट्टी या पुर्नवसन झालेल्या गावात रस्ते व गटारे बनविण्यासाठी निधी शासनाने मंजूर केला होता. यानुसार अक्करपट्टी गावातील भंडार आळी येथे पुर्नवसन करताना राहिलेल्या गटाराचे काम करण्यात आले. यातच भंडार आळी येथे सुस्थितीत रस्ते गेल्या पाच वर्षापूर्वी बांधण्यात आले होते. परंतु स्थानिक भुमाफियांच्या सांगण्यावरून ठेकेदाराच्या अभियंत्याने झालेल्या कामावरच डांबर टाकून लाखो रूपयाचा निधी वाया घालवला आहे. याकामाला विरोध करण्यात आला असून बेकायदेशीर केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यात येवू नये तसेच नियमानुसार खराब झालेले रस्ते बनवावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांन कडे नागरीकांनी केली. यावेळी बांधकाम विभागाने देखील याठिकाणी केलेले काम आम्हाला न सांगता केल्याचे मान्य करत पुढील काम बंद करण्यात आले आहे.
अक्करपट्टी गावातील खराब झालेले रस्ते दुरूस्ती व डांबरीकरण करण्यासाठी साधारण 50 लाखाचा निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. यानुसार जिजाऊ कन्स्ट्रक्शन या संस्थेला ठेका देण्यात आला होता. अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या रस्त्यांच्या व्यतिरिक्त ठेकेदाराने काम केल्याने लाखोचा निधी वाया गेला आहे. गावातील पाटील आळी- पोफरण रस्ता तसेच अक्करपट्टी मुख्य रस्ता अतिशय खराब असून या रस्त्यावरून दररोज वाहनांची वरदळ असते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे काम करताना याकडे दुर्लक्ष केले. यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी अक्करपट्टी ग्रामपंचायतीला पत्र देवून नेमके रस्ते कोणत्या भागातील करायचे याबाबत विचारणा केली होती. ग्रामपंचायतीने माहिती देण्याच्या अगोदरच नियमबाह्य काम केल्याने इतर रस्ते तसेच राहिले आहेत.
◾ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात आलेली नाही. रस्त्यांचे काम करण्याचे ठिकाणी बदलल्या नंतर पुन्हा निविदा प्रक्रिया करणे नियमानुसार अपेक्षित होते. बांधकाम विभागाने गावातील रस्त्यांची पाहणी करून रस्ते दुरूस्ती करणे बंधनकारक असताना ग्रामपंचायतीला पत्र देवुन अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
◾ज्याठिकाणी रस्ते खराब आहेत अशा ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार होते. ग्रामपंचायतीला देखील तसेच पत्र देण्यात आले होते. ठेकेदाराच्या अभियंत्यांनी डांबरीकरणाचे केलेल्या कामाची माहिती आम्ही दिली नाही. तसेच काम आमच्या सुचनेनुसार केले नसल्याने याकामाचे कोणत्याही प्रकारचे मुल्यांकन केले जाणार नाही.
— अजय जाधव, अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर