पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना यशस्वीरित्या राबवितानाच लसीकरणाला गती देणे तसेच अर्थव्यवस्थेला चालना देतानाच महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करुन ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज सांगितले. नवनियुक्त मुख्य सचिवांनी आज मुख्य सचिव कार्यालयात पदभार घेतला. यावेळी माजी मुख्य सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच राज्यात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यात येणार आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ न बसता ती अधिक गतीमान होण्याकरिता प्रयत्न करतानाच राज्यात सुरु असलेले महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य सचिव कुंटे यांनी सांगितले.