तक्रारदारांचा तालुका पोलिस ठाण्यात हेलपटा
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: येथील मुख्य पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येत असलेल्या कुडूस, खानिवली, गो-हे व परळी या चार पोलिस दूरक्षेत्रापैकी कुडूस पोलीस दुरक्षेत्र वगळता अन्य तीन पोलीस दुरक्षेत्र नेहमीच कुलूप बंद असतात. यामुळे या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
वाडा तालुक्यात 159 लहान मोठी गावे आहेत. सव्वादोन लाख लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यात वाडा येथे मुख्य पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्यातील कुडूस, खानिवली, गो-हे व परळी या चार ठिकाणी पोलीस दुरक्षेत्र आहेत. मात्र या चार पोलीस दुरक्षेत्रांपैकी खानिवली, गो-हे व परळी ही तीन पोलीस दुरक्षेत्रे नेहेमीच कुलूप बंद अवस्थेत असताना दिसुन येत आहेत.
वाडा या तालुका मुख्यालयी असलेल्या मुख्य पोलीस ठाण्यापासुन अनेक गावांचे अंतर हे 30 ते 40 किलोमीटर लांबीचे आहे. या ठिकाणी एखादी घटना, वादाचा प्रसंग घडल्यास संबंधीत व्यक्तींना गावाजवळील पोलीस दुरक्षेत्र कुलूप बंद अवस्थेत दिसून येत असल्याने या तक्रारदारांना सरासरी 15 ते 20 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. या भागात गेल्या चाळीस वर्षांपासुन पोलिस दुरक्षेत्रांची अशी अवस्था आहे. येथील पोलीस दूरक्षेत्राच्या अंतर्गत 20 ते 25 गावे असून साठ ते 70 हजार लोकसंख्या आहे. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विभागवार असलेल्या पोलिस दूरक्षेत्रांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.
तालुक्यातून भिवंडी-वाडा-मनोर हा राज्य महामार्ग जात असून या महामार्गावर दररोज अनेक लहानमोठे अपघात घडतात. अशा वेळी वेळेवर पोलिस घटनास्थळी पोहचत नाहीत त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलिस दूरक्षेत्रात पोलिसच नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. पोलिस दूरक्षेत्रे बंद असल्याने भुरट्या चो-यांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय अवैद्य धंद्यातसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकंदरीत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.
◾ वाडा पोलीस ठाण्यात अनेक पोलिस अधिकारी व 40 हुन अधिक पोलिस कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत, यामुळे काही पोलीस दुरक्षेत्र काही वेळेसाठी बंद रहातात.
— सुधीर संख्ये, पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे वाडा
◾ स्वातंत्रपुर्व काळापासून असलेल्या परळी पोलीस दुरक्षेत्र कार्यालय सद्या पोलिस कर्मचाऱ्यांअभावी नेहमीच बंद दिसून येते.
— तारक जाधव, सामाजिक कार्यकर्ते, परळी, ता.वाडा.